वरवर पाहिलं तर अगदी शांत, निथळ, निरागस पण अंतरात काय दडलंय याचा ठावठिकाणा लावणं म्हणजे अथांग सागराचा तळ शोधण्यासारखं आहे.
म्हणूनच की काय,
माझे असूनही, मला कळेना
घडते का हे असेच सारे ।
मनात उठती असंख्य लाटा,
मन भरकटते हरवून किनारे ।
जेंव्हापासून कळायला लागत, अगदी तेंव्हापासून ते या क्षणापर्यंतचा सगळा प्रवास मनाच्या कॅमेरात कैद होतो. नि मागे उरतात त्या फक्त आठवणी.
तस पाहायला गेलं, तर आपण काहीच विसरत नाही. एखादं गाठोड भराव तस फक्त आठवणी साठवत जातो. एखाद्या दिवशी अडगळीच्या खोलीत एखादी गोष्ट शोधायला जातो, पण त्या गोष्टीपर्यंत पोहचायच्या आधी काही तरी हाताला लागत, नि आपण भरकटतो. कधी कधी इतकं की, जे शोधायला आलो होतो ते बाजूलाच राहतं.
आपण बसतो वेगळाच डाव मांडून.
काही वेळानं भानावर येतो, खऱ्या जगात.
पण खरं सांगायचं झालं तर, सगळं हवंहवसं वाटत, हे कधीच संपू नये या विचारात पुन्हा एकदा भरकटण्याचा प्रयत्न करतो पण यावेळी तसं काही होत नाही, कारण आता मनाला वर्तमानाची जाणीव झालेली असते.